• पद्मविभूषण शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते काळे यांचा गौरव.
पिंपरी: राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे 'भव्य वारकरी संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. संमेलनात संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा 'विशेष सामाजिक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे शहरात पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी झाले होते. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत संमेलनाची सुरुवात करण्यात आली. संम्मेलनामध्ये उद्घाटन सत्र, परिसंवाद,पुरस्कार वितरण इ. कार्यक्रम पार पाडण्यात आले. 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले.
दरम्यान, देशाचे नेते शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा आतापर्यंत केलेल्या सामाजिक,अध्यात्मिक, क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून 'विशेष सामाजिक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,हभप शामसुंदर सोन्नर महाराज,हभप डॉ बालाजी जाधव, हभप ज्योती जाधव महाराज,मुबारक शेख महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सतीश काळे यांचा अल्प परिचय
सतीश काळे गेल्या पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेड या पुरोगामी चळवळीत सक्रियपणे कार्यरत आहेत. काळे यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अनेक आक्रमक आंदोलने करीत सरकारला जाब विचारला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळे यांनी अनेक आंदोलने तसेच उपोषण केले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सतीश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तसेच संभाजी बीडीचे नाव बदलण्यात यावे, यासाठी आक्रमक आंदोलन करीत अखेर संभाजी बीडीचे नाव बदलण्यात आले.चिंचवड गावातील मोरया गोसावी देवस्थानामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांविषयी लावलेला वादग्रस्त माहिती फलक काळे यांच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात देवस्थान समितीने जाहीर माफी मागत माहिती फलक बदलला होता.पिंपरी चिंचवड महापालिकेतील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्या प्रकरणी काळे यांनी मोठे जन आंदोलन उभारले होते,हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते.तसेच त्यांनी या घोटाळ्याची ईडीकडे तक्रार केली होती.तसेच काळे यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी 'रक्तदान शिबीर' तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन करीत असतात.
0 Comments