Hot Posts

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन....

 


        पिंपरी दि. २६ जून २०२५ :-थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, त्याचप्रमाणे सामाजिक क्रांतीचे प्रणेते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि केएसबी चौक चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले.

      पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर मंगला कदम, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, मिलिंद वेल्हाळ, शांताराम खुडे, सुनील पाटील, विजय नाळे, जगदीश परिट, संग्राम पाटील, लहु पवार, संदिप देसाई, पी. बी. पाटील, युवराज तिकटे, बापू गायकवाड, दत्ता गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

       केएसबी चौक चिंचवड येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा प्रांगणात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उप आयुक्त  अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते धनाजी येळकर पाटील, अजिझ शेख, वैभव जाधव, बापू गायकवाड, सखाराम रेडेकर, शामराव पताडे, नामदेव शिंत्रे, प्रविण कदम, अप्पा पाटील, अरूण गळतगे, शिवाजीराव पाटील, लक्ष्मण टकेकर, विश्वनाथ टकेकर, सुधीर पाटील तसेच विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

       दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन चिंचवड येथील साई मंदिर उद्यान येथे करण्यात आले. यावेळी माजी महापौर मंगलाताई कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रा. महेश निगडे, प्रा. दिलीप शेलार, शाहीर प्रकाश ढवळे, लेखक श्रीकांत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, विजय नाळे,मिलिंद वेल्हाळ,जगदीश परिट,सुनिल पाटील यांच्यासह कोल्हापूर मित्र मंडळाचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

      यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नव्हते, तर ते एक समाजसुधारक आणि शिक्षणासाठी झटणारे खरे लोकराजेही होते. त्यांनी आपल्या काळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरांना आव्हान देत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांची विचारधारा आजही समाजासाठी दिशादर्शक असून ती पुढील पिढ्यांनीही जपली पाहिजे.

     पहिल्या दिवसाची सांगता ‘’वीर धुरंधर योध्यांचा जागर – शिवशंभो गर्जना’’ या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात अभिजित जाधव व आमु जाधव यांनी रणवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते सादर केली. यावेळी अत्याधुनिक वाद्यांच्या जुगलबंदीवर त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि महापुरूषांच्या कार्याचा, विचारांचा आणि जीवनप्रवासाचा जागर केला. यावेळी त्यांनी ‘’साथीला माती तांबडी, शाहू महाराज मूर्ती रांगडी’’, ‘’वाघ शिवबा जन्मला’’, ‘’रायगड किल्ला, महाराष्ट्राची शान’’ अशी स्फूर्तीदायक गीते सादर करून संबळ-दिमडी वाद्यांची जुगलबंदी सादर केली. या कार्यक्रमात त्यांना सुनिल शिंदे, भावेश खानविलकर यांची साथ लाभली.

      यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. निगडे यांनी दहावीप्रमाणे बारावी देखील महत्वाचे वर्ष असते. बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होतो. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या विषयात प्रवेश घ्यायचा हा प्रश्न असतो. बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण निवडतात, तर बरेच विद्यार्थी फार्मसी किंवा डॉक्टरेटचे शिक्षण निवडतात. सध्या या दोन्ही विषयांमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा याव्यतिरिक्त इतर व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे कल असायला हवा. त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट, डेटा सायन्स, फिल्ममेकिंग, एआय इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध आहे. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयामध्ये प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर परदेशात नोकरी करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. त्यासाठी जर विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकायची असेल तर त्यासाठी देखील विद्यापीठामध्ये किंवा इतर महाविद्यालयांमध्ये जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा शिकविल्या जातात. तुम्हाला परकीय भाषा येत असतील तर परदेशात नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते असे सांगितले.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments