• पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन.
पिंपरी चिंचवड दि.२३/०९/२०२४-: मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांना विविध आश्वासने दिली आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे.
यामुळे राज्यभरातील मराठा समाज प्रचंड चिडलेला आहे त्यामुळे सोमवार दिनांक २३ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आत्मक्लेश व धरणे आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला तसेच जरांगे पाटील यांना दिलेला शब्द सरकारने पाळावा सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे राज्य सरकारला महागात पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा. सगे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे. हैदराबाद गॅजेट,सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करावे मराठा आंदोलकां वरील दाखल सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावेत जरांगे पाटील यांना दिलेल्या सर्व आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करावी मराठा समाजाची फसवणूक करू नये अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
मागण्या मान्य न करता मनोज जारंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे पिंपरी चिंचवड शहरात आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीत म्हणून आत्मक्लेश व धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.
0 Comments