- संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा.
पिंपरी चिंचवड दि.२६-: देशात नुकत्याच राजकीय निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सर्वसामान्यांना अर्ज दाखल करता येईल,अशी तरतूद केवळ भारताच्या संविधानातच पहायला मिळते. या संविधानाचा आणि घटनात्मक तरतुदींचा आदर्श जगातील लोक घेत आहेत. देशातील बळकट संविधानामुळे भारतात सक्षम लोकशाहीची उभारणी झाली असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले.संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तसेच स्मारकातील संविधान प्रतीजवळ संविधान दिनानिमित्त संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष लहुजी लांडगे,संघटक योगेश पाटील, किरण खाजेकर,विश्वनाथ जगताप आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सतिश काळे म्हणाले की, राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे. भारतातील विविध धर्म,जाती आणि कोट्यवधी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. आपले संविधान आपल्याला सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही आणि प्रजासत्ताक या मूल्यांवर आधारित आहे. यातूनच आपल्याला समानता,स्वातंत्र्य, न्याय,आणि बंधुता यांचा आधार मिळतो. या राज्यघटनेचा गौरव करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
0 Comments