पिंपरी : भारत हे बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा वाचण्या व ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे व ते आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरातील ५ वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वामध्ये थेरगाव येथील डांगे चौकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य शाहिरीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध पोवाडे व शायरी प्रस्तुत करून उपस्थित शिवप्रेमीं प्रेक्षकांची मने जिंकली, यामध्ये शिवजन्म पोवाडा, नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा, शिवशंभूराजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, डफावर थाफ मारुनी गातो आम्ही जयजयगान...सह्याद्रीची कडेकपारी दुमदुमली, ललकार, काळाच्या जबड्यात घालूनी हात, तसेच वेगळ मला दिसतंय रे बाबा... शाहिरी फटका आदी विषयावरील आपल्या पहाडी आवाजात विचिध पोवाडे व शायरी प्रस्तुत केली.
शाहिरी कार्यक्रमात ग प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या हस्ते शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उप अभियंता सचिन नांगरे, कनिष्ठ अभियंता पवन तांदळे, प्रमोद खराडे, बाबासाहेब साळवे, आदी उपस्थित होते.
0 Comments