पुणे : गेल्या चार पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबत कोर्टाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबबत उत्सुकता होती. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
महायुती म्हणूनच तिन्ही घटक पत्र एकत्र निवडणुका लढवू. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर तिन्ही पक्षांच्या संमतीने वेगळे लढू. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका निवडणुका वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे, त्या भागात गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
महायुती राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढेल. कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करतात, त्यामुळे त्यांना संधी मिळावी असे वाटणे साहजिक आहे. त्यांची इच्छा स्वाभाविक आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांना हेच वाटते. पण काही ठिकाणी शक्य नसल्यास निवडणुकीनंतर युती होऊ शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, यावरही त्यांनी यावेळी भर दिला.
0 Comments