Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशीव जिल्ह्यातील तांदूळवाडी ग्रामसभेने केला केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाचा ठराव.

 

• मालवण पुतळा दुर्घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त.

     तांदुळवाडी, धाराशिव दि.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला. महाराष्ट्रातील जनता आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अपमान कधीच सहन करत नाही.
        त्यामुळे महाराष्ट्रातील शहर तसेच ग्रामीण भागात प्रचंड आंदोलने होत आहेत. जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे.याच पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यातील तांदूळवाडी ग्रामपंचायत मधे गुरुवार दि.२९ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली. यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऐनवेळीच्या विषयात मालवण पुतळा दुर्घटना विषय ग्रामस्थांनी उपस्थित केला.उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

     लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने घाईगडबडीत तीन वर्षात होणारे काम सहा महिन्यात पूर्ण केले.चार डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सदर पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा जयदीप आपटे या अनुभव नसलेल्या शिल्पकाराकडून उभारला होता.घाईगडबडीत उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते.देशात गेल्या शंभर वर्षात महाराजांचे शेकडो पुतळे उभारले.यातील एकही पुतळा पडला नाही.

      मात्र मालवण येथील पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला.या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा शिवप्रेमीं मधे संशय आहे.याविषयी ग्रामसभेत संतप्त गावकऱ्यांनी एकमताने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून शिल्पकार व इतर सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून सरकारने कारवाई करावी असा ठराव मंजूर करण्यात आला.

        सदरचा ठराव संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतिश भास्करराव काळे यांच्या सुचनेनुसार शशिकांत पाटील यांनी मांडला.नितीन शंकर काळे यांनी अनुमोदन दिले.ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.सदर ग्रामसभा तांदुळवाडीचे सरपंच प्रणित शामराव डिकले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपसरपंच महावीर ढिकले,वैभव काळे,दत्ता कोल्हे,अभिजीत काळे,अश्रुबा लिमकर,सुशील काळे,माधव पाटील,सुदर्शन काळे,करण डिकले,सुशील काळे,राहुल काळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य नितीन काळे यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments